Sunday 1 July 2007

युती तुटायला हवी का? - माझे मत

मराठी संकेतस्थळ उपक्रम येथे झालेल्या "शिवसेना - भाजपा युती तुटायला हवी का?" या चर्चेत लिहिलेला हा प्रतिसाद:



युतीचे राजकारण हे नेहमीच गरजेसाठी होते. मग ते कोणत्याही पक्षांचे असुदेत. शिवसेना - भाजपा युती हि कदाचित अशी एक युती आहे कि ती अनेकदा तुटता तुटता राहिली आहे. महाराष्ट्रातले महत्वाचे ४ राजकिय पक्ष जे म्हणवून घेतात त्यातल्या दोन (शिवसेना आणि राष्ट्रवादी) पक्षांना देशव्यापी पाठिंबा नाही. हे खरतर प्रादेशिक पक्षच म्हणायला हवेत. या दोन्ही पक्षांना सत्तेची चटक जास्त आहे. इतरांना नाही असे नाही. पण हे दोन पक्ष स्वबळावर राष्ट्रीय पातळीवर यश मिळवू शकत नाही. पण स्वतःच्या प्रादेशिक ताकतीने इतर २ राष्ट्रीय पक्षांना जेरीस आणू शकतात आणि तेच ते करत आहेत. आम्हा सामान्य मराठी लोकांना याचे आता काहीच वाटत नाही. सांगकाम्या व्यक्ती जर राष्ट्रपती झाली तर ती मराठी असल्याची लाज मात्र नक्कि वाटेल.

अलिकडचे राजकिय पडसाद पाहिले तर काहीसे असे वाटते,
१. भाजपा: चाचपडणारा राष्ट्रीय पक्ष
२. काँग्रेसः आत्ता सत्ता आहे तो पर्यंत सोनियाचे दिवस जगा. उद्या कोणी पाहिलाय? मग सत्तेसाठी वाट्टेल ते करावी लागले तरी चालेल.
३. शिवसेना: थोडी मराठी अस्मिता, थोडी कात टाकायचा प्रयत्न, स्वतःला वाघ म्हणत कळपासोबतच राहणारे, एका बाजून काँग्रेसचा चेहरा घेण्याचा प्रयत्न करणारे.
४. राष्ट्रवादी: काँग्रेस मधून फुटलेली शिवसेना, यांच्यात सगळे गुण काँग्रेसचेच पण आवेश आणि प्रादेशिकता शिवसेनेची. स्वतःला शिवसेना वाटून घ्यायला लाज वाटते. यांना काँग्रेसचे, सोनियाचे दिवस पाहवत नाहित. शरद पवार जीवंत असे पर्यंत यांचा पक्ष म्हणून प्रभाव. नंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील. जर पवारांना पंतप्रधान होण्याची खात्री दिली तर इतिहासा नुसार पवार लगेचच काँग्रेसमध्ये विलीन होतील.
५. मनसे: गरजेल तो बरसेल काय? स्वतःला स्वाभिमानी म्हणवत पुण्यात मात्र कलमाडींच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न केला. तो फसला. महाराष्ट्र नवनिर्माणाच्या घोषणा दिल्या खर्‍या पण एका गल्लीचे नवनिर्माण केले असले तर शप्पथ. नावात सेना पण एकूण राजकिय धर्म काँग्रेसचाच वाटतो.

एकुण काय? कोणा एकामध्ये ताकत नाही. युती तुटली काय आणि नाही तुटली काय? स्वबळावर लढायची आणि जिंकायची ताकत कोणाच्यातच नाही.

क्षणभर हे मानु कि शिवसेनेने मराठी म्हणून प्रतिभा पाटील-शेखावत यांना पाठिंबा दिला आहे. कलामांना विरोध करताना सेनेने सांगितलेले कारण म्हणजे त्यांनी अफजलच्या फाशीसाठी केलेला विलंब वा निर्णय न घेणे यासाठी ते हिंदुत्वाचे कार्ड वापरत आहेत आणि आत्ता मराठीपणाचे. पण प्रतिभा पाटील-शेखावत जर राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्या तर त्यांनी अफजलला फाशी देण्याची हमी शिवसेनेला दिली आहे का एक मराठी पक्ष पाठिंबा देतो आहे म्हणून? हिंतुत्व आणि मराठी बाणा यामध्ये शिवसेना गोंधळलेली आहे. इकडे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणार्‍या या यु. पी. ए. ला शिवसेनेचा पाठिंबा कसा चालतो? तेंव्हा गप्प का? आणि तेंव्हा कुठे जाते शिवसेनेचे हिंदुत्व?

सत्तेच्या मोहापायी भारतात काहिहि होउ शकते यावर आमचा गाढ विश्वास आहे. त्यामुळे युती टिकावी का टिकु नये यावर भाष्य करणे हे हास्यास्पद आहे.

माझ्यामते आपण द्विपक्षीय राजकारण्याच्या दिशेने चाललो आहोत. त्याची हि कुठे तरी सुरूवात आहे. बराच काळ जाइल. पण द्विपक्षीय लोकशाही भारतीय स्वीकारतील. मग कसली युती अन कसल काय? आजच्या या अवस्थेला भारतीयच जबाबदार आहेत आणि भारतीय स्वतःच त्यावर तोडगा काढतील.

उद्या कम्युनिस्टांचे स्टंट वाढल्यास काँग्रेस - भाजपा युती होईल. भारताला राजकिय स्थैर्य मिळाण्यासाठी ती एक गरज बनणार आहे हे आमचे भाकित आहे.

3 comments:

Chinmay said...

मला भा.ज.प आणि काँग्रेसची युती परवडेल पण राष्ट्र-द्रोही कम्युनिस्ट पक्षाला थांबवणे फार आवश्यक आहे.

आपले भारतीय राजकारणाची वाटचाल द्विपक्षीय बैठकीकडे होते आहे हे मत मान्य आहे. तसे होणे स्वागतार्ह आहे व अत्यंत आवश्यक आहे.

HAREKRISHNAJI said...

perfect

Anonymous said...

well said