Friday 12 October 2007

भारतीय मतदार

आपल्याकडे ग्रामपंचायती पासून लोकसभे पर्यंत कोणत्याही निवडणुका आल्या कि शब्दांचे खेळ सुरु होतात. मतदाराचा लगेच मतदार राजा होतो. जगभरात थोड्याफार फरकाने सगळीकडे हिच परिस्थिती असावी असे वाटते. (वेगळी असू शकते.) पण आपल्याकडे जरा खासियत असते. भारतीय मतदार जरा हटकेच आहेत हे मात्र खरे.

भारतात निवडणुक कशासाठी होते आणि कोणासाठी होते हा एक मोठा अभ्यासाचा प्रश्नच आहे. मतदान कोणत्या कारणासाठी होते कोण करते हे सगळेच एकदम अभ्यासाचे मुद्दे आहेत. निवडणुका ग्रामपंचायतीच्या असतात, साखर कारखान्यांच्या, दुधसंघांच्या…….. विधानसभेच्या आणि लोकसभेच्या. निवडणुका होतात पण वर्षानुवर्ष त्याच त्याच मुद्यांवर होतात. मतदारांची मानसिकता फारशी बदलेली नाही. खरतर मतदान हा शब्दच कसा आहे ना? मत आपलं असत. ते आपण देणार असतो. खास करून अशा माणसाला जो समाजासाठी काही ना काही कार्य करणार असतो. आपण स्वतः सुद्धा समाजाचा एक अविभाज्य भाग आहोत. त्यामुळे मतदान हा आपला स्वार्थ आहे. आपण मत देतो ते एका मोबदल्यासाठी. मग ते दान कसे?

आपल्याकडे १३ दिवसात सरकार पडले, परत निवडणुका झाल्या. पण सरकार पडायचे कारण काय? कांद्याचा भाव. ठिक आहे. मान्य आहे. पण त्यानंतर आजवर अनेकदा अनेक भाव अतर्क्य वाढले. पण आता सरकारे नाहीत पडत. एक बाजु मान्य करू कि हा राजकारणाचा भाग आहे. पण एकदा कांद्याच्या भावासाठी मतदान करणारा मतदार अणूकराराच्या मुद्यासाठी इतका निराश? अस का व्हावं बर? मुळातच मतदान करणारे मतदार कोण? हाच कळीचा मुद्दा आहे. आपल्याकडे कधीतरीच भरभरुन मतदान होते. जेंव्हा भारतात मतदान ८०% वगैरे होईल त्यावेळी भारतात नक्किच काहितरी जोरदार घडले असणार आहे. कारण एकदम सरळ आहे. सर्वसामान्य, प्रत्येक भारतीय मतदार सर्वात पहिले म्हणजे उजडेचमन असतो. माझ्या एकट्याच्या मताने काय फरक पडणार आहे? शेवटी राजकारण हा घाणेरडा खेळ आहे, आम्हाला त्याचा भाग व्हायचे नाही. आम्ही मतदान करू, पण बोगस मतदान कोण थांबवणार वगैरे वगैरे सगळे मुद्दे मतदान न करण्यासाठी नेहमीच पुढे येतात. मग मतदान होते ते कोणाचे? ज्यांना रोजच्या रोटीचा प्रश्न आहे. ज्यांना कर भरायचाच नाही. ज्यांना कधी स्वतःचे पक्के मोठे घर बांधायचेच नाही. ज्यांना अनधिकृत गोष्टी अधिकृत करुन घ्यायच्या आहेत. हे असे मतदार मग नेटाने मतदान करतात कारण त्यांना समाजाच्या उद्याची चिंता नसते कि त्यांच्या पुढच्या काही वर्षांची.

सरकारे बनतात, पडतात, तुम्ही आम्ही त्यांच्या कायद्याच्या चौकटीत राहुन आयुष्य जगतो, रेशन कार्डावर सामान आणायला आपण जातच नाही. आतातर ते आपल्याला मिळत देखील नाही. मग त्यावर मिळणारे धान्य काय प्रतिचे आहे? हे कशाला पहायला जातोय? पण सरकार मात्र आम आदमीचा नारा देउन नवीन चित्रे रंगवुन घोटाळे करतात. कर आपण भरतो, पण खिसे कर न भरणार्यांचे भरतात. काहिजणांचे निवडणुक उभी होइ पर्यंत तर काहिंचे ऐन निवडणुकीच्या दिवसात. आपण मात्र आहोतच फॉर्म १६ भरायला तत्पर. नाहीतर सरकारचे प्रेमपत्र आहेच कधी ना कधी.

असे कित्येक मुद्दे आहेत जिथे आपण सगळेच भरडले जात असतो. मग मुद्दा कांद्याचा-डाळीच्या भावाचा असो, कि शस्त्रास्त्र खरेदिचा. आपण उदास, पण याचे जे दुरगामी परिणाम घडतात, त्याला जबाबदार कोण? आपणच आहोत. जरा डोळे उघडून बाहेर पहायला हवं. जगात अनेक देशात जागरुक मतदार आहेत. भरलेल्या कराचा मोबदला मिळालाच पाहिजे या भावनेने विचार करुन मतदान करणारे मतदार आहेत. जगात आपला देश एक जबाबदार देश आहे आणि आपल्या सरकारच्या निर्णयाचे जगावर चांगले वाईट परिणाम होणार आहेत याचा विचार करुन मतदान करणारे मतदार आहेत. मग भारतीय मतदार असे का? एवढे उदास, एवढे कमविचारी? कि आम्ही असेच आहोत? आम्हाला सगळंच जे घडत ते मान्य आहे? आम्हाला आमचं आमचं राज्य करायची इच्छा नाही? कि आमच्यावर लादलेलेच राज्य जास्त चांगल असत? छातीठोक पणे सांगायच कि भारतातली लोकशाही हि जगातली सर्वात मोठी आणि प्रगल्भ लोकशाही आहे. मात्र हे सांगताना मतदान करणारे मतदार खरच प्रगल्भ आहेत? भारतात मतदारांनी खरच आपला हक्क म्हणून मतदान केले, जगाची एक महासत्ता म्हणून मतदान केले, आपल्या समाजाच्या आणि परिसराच्या विकासासाठी मतदान केले तर? असे होइल का? भारतीय मतदार खरच सुजाण, अभ्यासू आणि जबाबदार मतदार बनेल काय?

2 comments:

Anonymous said...

kharch khupch udasin ahet lok apalya deshatale matdanabaddal.
mihi aajvar matdan konala tari nivadun denyapeksha mazya matacha durupyog hou naye mhanunch karate. ani anekanna tech sangun matdanala jayala sangate. kiman tevhadyasathi tari matadan kara. bad situation :(

Prachi

Anonymous said...

Amiable brief and this mail helped me alot in my college assignement. Say thank you you as your information.